Monday, June 5, 2017

म्हारी छोरिया छोरोंसे कम है के ? ('दंगल' समीक्षा)


(मी जिथे मोठे स्पॉइलर्स आहेत तिथे तसे लिहिलेले आहे .बायोपिक असल्यामुळे त्यात रहस्य काही नाही . पण तरी चित्रपटातले काही तपशील उघड होऊ शकतात. ज्यांना पूर्ण कोरी पाटी हवी आहे त्यांनी चित्रपट बघितल्यावरच वाचावे.) 
                     

                                                    लेखाच्या शीर्षकाचे आणि 'दंगल' चित्रपटच्या पोस्टर वरचे हे वाक्यच या चित्रपटाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे . हा चित्रपट सांगू पाहतो आणि त्याचा आशय हाच आहे . जेव्हा तो या सूत्राला धरून राहतो तेव्हा खूप चांगला वाटतो . पण हे प्रत्येक वेळी होत नाही आणि स्पीडब्रेकर जाणवतात. पण तरी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे . आणि हो शक्यतो थिएटर मधेच !




                                                   चित्रपटाची कथा थोडक्यात अशी : महावीर फोगाट (आमीर खान ) हा नॅशनल लेवलचा एक पहिलवान. आर्थिक परिस्थिती आणि नोकरीची गरज म्हणून नाइलाजाने कुस्ती सोडावी लागलेला. देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आपला मुलगा तरी पूर्ण करेल ही त्याला आशा . पण मुलाऐवजी चारी मुलीच झाल्यामुळे तो प्रचंड निराश होतो . पुढे एका प्रसंगात त्याच्या गीता आणि बबिता ( जाइरा वासीम आणि सुहानी भटनागर ) या मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत हे त्याच्या लक्षात येते आणि तो त्यांना अत्यंत खडतरपणे आणि प्रसंगी जबरदस्ती करून कुस्तीसाठी तयार करतो . पुढे दोघी विविध टप्पे पार करून वाटचाल करत राहतात. मोठ्या झाल्यावर गीता आणि बाबिताची (फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा) पाटीलयाला येथील संस्थेसाठी निवड होते आणि देशासाठी खेळण्याची संधी मिळते .




                                                     चित्रपटात मुख्यत्वे गीताच्या कारकीर्दीवर फोकस ठेवलेला आहे . पण बबिता अनेक महत्वाच्या ठिकाणी दिसत राहते . मगाशी म्हणल्याप्रमाणे चित्रपट जेव्हा मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत हे सूत्र धरून राहतो तेव्हा खूप छान गुंतवून ठेवतो . पहिल्या भागात म्हणजे त्या पटियालच्या संस्थेत जाईपर्यंत अशा जागा भरपूर आहेत आणि तेव्हा चित्रपट खूप चांगला वाटतो . महावीरला मुली होत राहणे आणि त्याची निराशा , चारी मुलीच झाल्यावर निराश होऊन त्याची सगळी मेडल्स आत ठेवून देणे , मग तो साक्षात्कारसारखा प्रसंग , मुलींना शिकण्याची सक्ती , मुलींच्या टाळण्यासाठी क्लूपत्या , मग त्या पार्टीत त्यांच्या मैत्रिणींनी दिलेली जाणीव आणि मग त्यांचे मतपरिवर्तन , त्या 'तयार' झाल्यावर त्यांना मुलांशी लढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणे , आयोजकांचा नकार आणि मुलींना 'बघायला' प्रेक्षक येतील म्हणून परवानगी देणे ,काहींचा हट्टी नकार , आणि गीताने आपल्या कामगिरीतून सगळ्यांनाच एक उत्तर देणे अशा अनेक अप्रतिम जागा त्यात आहेत आणि त्या खिळवून ठेवतात .




                                                 हा पहिला भाग असा खिळवणारा झाला आहे . आपल्याला तो गीताच्या (आणि बाबिताच्या) सुखदुक्खाशी समरस करतो . यातली अजून एक चांगली गोष्ट म्हणजे तो आपल्याला महावीरविषयी मत बनवण्याची मुभा देतो . तो ज्याप्रकारे जबरदस्ती करतो हे चूक आहे असे बर्‍याच जणांचे मत असेल. आमीर खान हीरो असून सुद्धा चित्रपट त्याची ही कठोर बाजू दाखवतो आणि त्यावर उगाच मलमपट्टी करत नाही. या मुली सुद्धा पहिल्यांदा त्या टाळण्यासाठी खूप खटपटी करतात पण स्पॉइलर अलर्ट सुरू : त्यांच्या मैत्रिणीनी त्यांना कुस्ती खेळायची नसेल तर घरकाम करत आयुष्य काढावे लागेल दूसरा पर्याय नाही ही जाणीव दिल्यावर त्यांचे ते स्वीकारणे स्पोईलर अलर्ट समाप्त हे सुद्धा जमले आहे . अशी परिस्थिति असणे खर तर चुकीचे किंवा वाईट आहे पण ते त्यांच्यापुरते तरी कटू असले तरी सत्य आहे .



                                                        याचा अर्थ असा नाही की पहिल्या भागात काही प्रॉब्लेम नाहीत . अर्थातच आहेत . अति विनोदी हातळणी हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे . त्यामुळे बाप जबरदस्तीने या गोष्टी करत असताना मुलींची मनोवस्था (केस कापण्याचा प्रसंग सोडून ) दिसतच नाही . त्या आपल्या खोडकर पद्धतीने ते टाळण्याकडे तरी झुकतात किंवा तो वेगवेगळे आदेश देतो तेव्हा हावभावावरून विनोद निर्मिती करतात . पुन्हा आई , नातेवाईक आणि समाजाच्या विरोधाचे प्रसंग सुद्धा टिक मारल्यासारखे एकेका प्रसंगात आटपले आहे . अशा प्रसंगत समाज नुसता बोलून गप्प बसत नाही . तर होऊ न देण्यासाठी खूप प्रयत्न करतो . असो!


                                                          पण या चित्रपटात खरा प्रॉब्लेम दुसर्‍या भागात सुरू होतो . खर तर गीताच्या डोक्यात हवा जाने आणि गीता आणि बबिताचे parallel लाइफ आणि अर्थातच कुस्ती मॅच ही गोष्ट दुसर्‍या भागात नाट्य निर्माण करायला पुरेशी होती . पण पहिल्या भागात न केलेली गोष्ट दिग्दर्शक दुसर्‍या भागात करतो आणि ती म्हणजे आमिरच्या व्यक्तिरेखेला फिल्मी पद्धतीने हीरो बनवण्याचा प्रयत्न . या प्रयत्नात आमीरला हीरो बनवण्यासाठी संस्थेतला कोच (गिरीश कुलकर्णी) या पात्राला उगीचच खलनायक बनवले जाते . आता हा जे काही सांगतो त्यात चुकीचे काय आहे ? नवीन गोष्टी आणि तंत्र काही शिकायचेच नसेल तर सगळ्याच शिक्षण संस्था बंद कराव्या लागतील . आता सचिन तेंडुलकरची निवड भारतीय संघात झाली . असे झाल्यावर त्याने काही नवीन गोष्टी , काही advance technique किंवा युक्त्या शिकायला नकोत का ? भारतीय संघाच्या कोच चे सल्ले ऐकायला नकोत का ? अतिरेक वाईटच असतो . पण मी या कोच चे सल्ले ऐकणार नाही मी कायम आचरेकर सरांनी शिकवल्यासारखाच किंवा even worse भाऊ अजित जे सांगतो तसच करणार अस कसं चालेल ? नेमकी हीच गोची इथे झालेली आहे . मग त्याच्या पात्राला तो चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी विलन ठरवले जाते . शेवटच्या अत्यंत फिल्मी प्रसंगात स्पॉइलर अलर्ट सुरू : महावीरला गीताच्या फायनल मॅच ला येऊ न देण्यासाठी कोच ने त्याला खोलीत डांबून ठेवण्यापर्यंत मजल जाते . स्पॉइलर अलर्ट समाप्त असं खरच झालं असेल ?


                                                     दुसर्‍या भागात सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत . मगाशी म्हणल्याप्रमाणे गीताच्या डोक्यात हवा जाने आणि गीता आणि बबिताचे parallel लाइफ आणि अर्थातच कुस्ती. गीताच्या शेवटच्या मॅच च्या वेळी एक छोटी मुलगी महावीरला प्रसाद देते आणि नंतर महावीर गीताला जे सांगतो ते सुद्धा अत्यंत छान पटकथेचे उदाहरण आहे .



                                                     गीता आणि बबीता सकरणार्‍या चारी अभिनेत्रींनी आपली कामे खूप छान केली आहेत . खर तर छोट्या मुलींचे जास्त कौतुक कारण एक नॉर्मल स्कूलगर्ल ते अत्यंत आत्मविश्वासी पहिलवान हा फरक त्यांनी छान दाखवला आहे . मोठ्या अभिनेत्रींनी सुद्धा त्यांचे काम छान पुढे नेले आहे आणि नंतरच्या प्रसंगत स्वतची छाप सोडली आहे . रोहित आणि अपरशक्ती खुराना दोघांनी महावीरच्या छोट्या आणि मोठ्या भाच्याची कामे छान केली आहेत . विनोदाची गरज पूर्ण केली आहे . आई साकरणार्‍या साक्षीवर मात्र अन्याय झाला आहे . एवढ्या चांगल्या अभिनेत्रीला फक्त बॅकग्राऊंड वर राहायचं काम आहे . तिने काम छान केले आहे . आमीर खान ने खरोखरच चांगले काम केले आहे . बर्‍याच वेळी आमीर खान ला पाहत असताना हा आमीरच आहे असच वाटत राहत. पण इथे मात्र स्टार वॅल्यू पुसून त्याने महावीर समर्थपणे साकारला आहे . हा त्याच्या सर्वोत्तम performance पैकी एक आहे .



                                                      यात सगळ्यात रंगत आणली आहे ती कुस्ती matches ने . त्या दोन्ही भागात आहेत आणि अत्यंत 'thrilling' आहेत . त्यावर खरच खूप चांगले काम झाले आहे . या matches आपल्याला खिळवून ठेवतात आणि हा सिनेमा आहे हे विसरून प्रेक्षक गीताच्या बाजूने समरस होतात . कुस्तीचे नियम समजावून देण्याच्या प्रसंग ही अत्यंत छान जमलेला आहे . किमान या matches साठी तरी हा सिनेमा मोठ्या पडद्यावरच पाहणे चांगले !




No comments: